Wednesday, February 21, 2024

MANACHE SHLOKA श्री मनाचे श्लोक

जय जय रघुवीर समर्थ 

श्री मनाचे श्लोक 

श्रीमनाचे श्लोक – १ ते १४०

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥नमूं शारदा मूळ चत्वारवाचा।गमूं पंथआनंत या राघवाचा ॥१॥

मनासज्जना भक्तिपंथेचि जावें।तरीश्रीहरी पाविजेतो स्वभावें॥जनीं निंद्यतें सर्व सोडूनिद्यावें।जनींवंद्य ते सर्वभावे करावे ॥२॥

प्रभातेमनी राम चिंतीत जावा।पुढे वैखरी राम आधी वदावा॥सदाचार हाथोर सांडूंनये तो।जनींतोचि तोमानवी धन्यहोतो ॥३॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे।मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥मना सर्वथा नीति सोडूं नको हो।मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥मना कल्पना ते नको वीषयांची।विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी।नको रे मना काम नाना विकारी॥नको रे मना सर्वदा अंगिकारू।नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।मना बोलणे नीच सोशीत जावें॥स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥मना चंदनाचे परी त्वां झिजावे।परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।सुखाची स्वयें सांडि जीवी करावी॥देहेदु:ख ते सूख मानीत जावे।विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥

मना मानसीं दु:ख आणूं नको रे।मना सर्वथा शोक चिंता नको रे॥विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥

मना सांग पां रावणा काय जाले।अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।परी शेवटीं काळमूखीं निमाला॥महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।जितां बोलती सर्वही जीव मी मी॥चिरंजीव हे सर्वही मानिताती।अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।अकस्मात तोही पुढे जात आहे॥पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।अकस्मात होणार होऊनि जाते॥घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥

मना राघवेंवीण आशा नको रे।मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥मना सत्य ते सत्य वाचे वदावे।मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥

बहू हिंपुटी होईजे मायपोटी।नको रे मना यातना तेचि मोठी॥निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥

मना वासना चूकवीं येरझारा।मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥मना यातना थोर हे गर्भवासीं।मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥

मना सज्जना हीत माझें करावें।रघुनायका दृढ चित्ती धरावें॥महाराज तो स्वामि वायुसुताचा।जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥

न बोलें मना राघवेवीण कांहीं।जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥घडिने घडी काळ आयुष्य नेतो।देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥

रघुनायकावीण वांया शिणावे।जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥

मना वीट मानूं नको बोलण्याचा।पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥सुखाची घडी लोटतां सूख आहे।पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥

देहेरक्षणाकारणें यत्न केला।परी शेवटीं काळ घेउन गेला॥करीं रे मना भक्ति या राघवाची।पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥

भवाच्या भये काय भीतोस लंडी।धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥रघूनायकासारिखा स्वामि शीरीं।नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥

दिनानात हा राम कोदंडधारी।पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे।वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं।नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥

समर्थाचिया सेचका वक्र पाहे।असा सर्व भुमंडळी कोण आहे॥जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥

महासंकटी सोडिले देव जेणें।प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥

अहल्या शिळा राघवें मुक्त केली।पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥जया वर्णितां शीणली वेदवाणी।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥

वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥चिरंजीव केले जनी दास दोन्ही।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥

उपेक्षी कदा रामरुपी असेना।जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥शिरी भार वाहेन बोले पुराणीं।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥

असे हो जया अंतरी भाव जैसा।वसे हो तया अंतरी देव तैसा॥अनन्यास रक्षीतसे चापपाणी।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥

सदा सर्वदा देव सन्नीध आहे।कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे॥सुखानंद आनंद कैवल्यदानी।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥

मना प्रार्थना तूजला एक आहे।रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे।मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे।जयाचेनि योगें समाधान बाणे॥तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे।मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥

मना पाविजे सर्वही सूख जेथे।अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥विविकें कुडी कल्पना पालटिजे।मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥

बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं।शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥विचारें बरें अंतरा बोधवीजे।मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥

बहुतांपरी हेंचि आतां धरावें।रघूनायका आपुलेसे करावें॥दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे।मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥

मना सज्जना एक जीवीं धरावें।जनी आपुलें हीत तूवां करावें॥रघूनायकावीण बोलो नको हो।सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।कथा आदरे राघवाची करावी॥नसें राम ते धाम सोडूनि द्यावे।सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥

जयाचेनि संगे समाधान भंगे।अहंता अकस्मात येऊनि लागे॥तये संगतीची जनीं कोण गोडी।जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥

मना जे घडी राघवेवीण गेली।जनीं आपुली ते तुवां हानि केली॥रघूनायकावीण तो शीण आहे।जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे॥४६॥

मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे।जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा।जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४७॥

सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा।सदा रामनामें वदे नित्य साचा॥स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा।जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४८॥

सदा बोलण्यासारिखे चालताहे।अनेकीं सदा एक देवासि पाहे॥सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा।जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४९॥

नसे अंतरी काम नानाविकारी।उदासीन जो तापसी ब्रह्मचारी॥निवाला मनीं लेश नाही तमाचा।जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५०॥

मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी।प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा।जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५१॥

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥करी सुखसंवाद जो उगमाचा।जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं।सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा।जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं।मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा।जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५४॥

नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा।जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू।स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥तया अंतरी क्रोध संताप कैंचा।जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५६॥

जगीं होइजे धन्य या रामनामे।क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥उदासीनता तत्त्वता सार आहे।सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥

नको वासना वीषयीं वृत्तिरुपें।पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥सदा राम निष्काम चिंतीत जावा।मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥

मना कल्पना कल्पितां कल्पकोटी।नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी॥मनीं कामना राम नाही जयाला।अती आदरे प्रीती नाही तयाला॥५९॥

मना राम कल्पतरु कामधेनु।निधी सार चिंतामणी काय वानूं॥जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता।तया साम्यता कायसी कोण आतां॥६०॥

उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे।तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥जनी सज्जनी वाद हा वाढवावा।पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥

निजध्यास तो सर्व तुटोनि गेला।बळें अंतरीं शोक संताप ठेला॥सुखानंद आनंद भेदें बुडाला।मना निश्चयो सर्व खेदे उडाला॥६२॥

घरी कामधेनू पुढें ताक मागें।हरीबोध सांडोनि वेवाद लागे॥करी सार चिंतामणी काचखंडे।तया मागतां देत आहे उदंडे॥६३॥

अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना।अती काम त्या राम चित्ती वसेना॥अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा।अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा॥६४॥

नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे।अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥धरीं रे मना आदरें प्रीति रामी।नको वासना हेमधामीं विरामीं॥६५॥

नव्हे सार संसार हा घोर आहे।मना सज्जना सत्य शोधुनि पाहे॥जनीं वीष खातां पुढे सूख कैचे।करीं रे मना ध्यान या राघवाचें॥६६॥

घनश्याम हा राम लावण्यरुपी।महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥करी संकटीं सेवकांचा कुडावा।प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६७॥

बळें आगळा राम कोदंडधारी।महाकाळ विक्राळ तोही थरारी॥पुढे मानवा किंकरा कोण केवा।प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६८॥

सुखानंदकारी निवारी भयातें।जनीं भक्तिभावे भजावे तयातें॥विवेके त्यजावा अनाचार हेवा।प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६९॥

सदा रामनामे वदा पुर्णकामें।कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें॥मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा।प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७०॥

जयाचेनि नामें महादोष जाती।जयाचेनि नामें गती पाविजेती॥जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा।प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७१॥

न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही।मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥महाघोर संसारशत्रु जिणावा।प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७२॥

देहेदंडणेचे महादु:ख आहे।महादु:ख तें नाम घेता न राहे॥सदाशीव चिंतीतसे देवदेवा।प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥७३॥

बहुतांपरी संकटे साधनांची।व्रते दान उद्यापने ती धनाची॥दिनाचा दयाळू मनी आठवावा।प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७४॥

समस्तामधे सार साचार आहे।कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥जिवा संशयो वाउगा तो त्यजावा।प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७५॥

नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही।नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥म्हणे दास विश्वास नामी धरावा।प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७६।

करी काम निष्काम या राघवाचे।करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे ॥करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां।हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां॥७७॥

अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं।तया पामरा बाधिजे सर्व कांही॥महाराज तो स्वामि कैवल्यदाता।वृथा वाहणें देहसंसारचिंता॥७८॥

मना पावना भावना राघवाची।धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची॥भवाची जिवा मानवा भूलि ठेली।नसे वस्तुचि धारणा व्यर्थ गेली॥७९॥

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते।तरा दुस्तरा त्या परा सागराते॥सरा वीसरा त्या भरा दुर्भराते।करा नीकरा त्या खरा मत्सराते॥८०॥

मना मत्सरे नाम सांडूं नको हो।अती आदरे हा निजध्यास राहो॥समस्तांमधे नाम हे सार आहे।दुजी तूळणा तूळितांही न साहे॥८१॥

बहु नाम या रामनामी तुळेना।अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥विषा औषधा घेतले पार्वतीशे।जिवा मानवा किंकरा कोण पुसे॥८२॥

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो।उमेसी अती आदरें गूण गातो॥बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें।परी अंतरी नामविश्वास तेथें॥८३॥

विठोने शिरी वाहिला देवराणा।तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।जिवा सोडवी राम हा अंतकाळीं॥८४॥

भजा राम विश्राम योगेश्वरांचा।जपू नेमिला नेम गौरीहराचा॥स्वये नीववी तापसी चंद्रमौळी।तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं॥८५॥

मुखी राम विश्राम तेथेचि आहे।सदानंद आनंद सेवोनि आहे॥तयावीण तो शीण संदेहकारी।निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥

मुखी राम त्या काम बाधुं शकेना।गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना॥हरीभक्त तो शक्त कामास भारी।जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥८७॥

बहू चांगले नाम या राघवाचे।अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे॥करी मूळ निर्मूळ घेता भवाचे।जिवां मानवां हेंचि कैवल्य साचें॥८८॥

जनीं भोजनी नाम वाचे वदावें।अती आदरे गद्यघोषे म्हणावे॥हरीचिंतने अन्न सेवीत जावे।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥८९॥

न ये राम वाणी तया थोर हाणी।जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी॥हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं।बहू आगळे बोलिली व्यासवाणी॥९०॥

नको वीट मानूं रघुनायकाचा।अती आदरे बोलिजे राम वाचा॥न वेंचे मुखी सांपडे रे फुकाचा।करीं घोष त्या जानकीवल्लभाचा॥९१॥

अती आदरें सर्वही नामघोषे।गिरीकंदरी जाइजे दूरि दोषें॥हरी तिष्ठतू तोषला नामघोषें।विशेषें हरामानसीं रामपीसें॥९२॥

जगीं पाहतां देव हा अन्नदाता।तया लागली तत्त्वता सार चिंता॥तयाचे मुखी नाम घेता फुकाचे।मना सांग पां रे तुझे काय वेंचे॥९३॥

तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां।निवाला हरु तो मुखे नाम घेतां॥जपे आदरें पार्वती विश्वमाता।म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां॥९४॥

अजामेळ पापी वदे पुत्रकामे।तया मुक्ति नारायणाचेनि नामें॥शुकाकारणे कुंटणी राम वाणी।मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं।जपे रामनामावळी नित्यकाळीं॥पिता पापरुपी तया देखवेना।जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥९६॥

मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची।अहंतागुणे यातना ते फुकाची॥पुढे अंत येईल तो दैन्यवाणा।म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा॥९७॥

हरीनाम नेमस्त पाषाण तारी।बहु तारीले मानवी देहधारी॥तया रामनामीं सदा जो विकल्पी।वदेना कदा जीव तो पापरूपी॥९८॥

जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी।तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी॥मुखे रामनामावळी नित्य काळीं।जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी॥९९॥

यथासांग रे कर्म तेंहि घडेना।घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना॥दया पाहतां सर्व भुतीं असेना।फुकाचे मुखी नाम तेंही वसेना॥१००॥

जया नावडे नाम त्या यम जाची।विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची॥म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे।मुखे बोलतां दोष जाती स्वभावें॥१०१॥

अती लीनता सर्वभावे स्वभावें।जना सज्जनालागिं संतोषवावे॥देहे कारणीं सर्व लावीत जावें।सगूणीं अती आदरेसी भजावें॥१०२॥

हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी।देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी॥परद्रव्य आणीक कांता परावी।यदर्थीं मना सांडि जीवीं करावी॥१०३॥

क्रियेवीण नानापरी बोलिजेंते।परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें॥मना कल्पना धीट सैराट धांवे।तया मानवा देव कैसेनि पावे॥१०४॥

विवेके क्रिया आपुली पालटावी।अती आदरे शुद्ध क्रीया धरावी॥जनीं बोलण्यासारिखे चाल बापा।मना कल्पना सोडिं संसारतापा॥१०५॥

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा।विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा॥दया सर्वभुतीं जया मानवाला।सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला॥१०६॥

मना कोपआरोपणा ते नसावी।मना बुद्धि हे साधुसंगी वसावी॥मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं।मना होइ रे मोक्षभागी विभागी॥१०७॥

मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥क्रियेवीण वाचाळता ते निवारी।तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥

जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।जनीं वादसंवाद सूखे करावा॥जगीं तोचि तो शोकसंतापहारी।तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥

तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।विवेके अहंभाव यातें जिणावें॥अहंतागुणे वाद नाना विकारी।तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥

हिताकारणे बोलणे सत्य आहे।हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥हितकारणे बंड पाखांड वारी।तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥

जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।परी वादवेवाद तैसाचि ठेला॥उठे संशयो वाद हा दंभधारी।तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥

जनी हीत पंडीत सांडीत गेले।अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे।मना सर्व जाणीव सांडुनि राहे॥११३॥

फुकाचे मुखी बोलतां काय वेचे।दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे॥क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे॥११४॥

तुटे वाद संवाद तेथें करावा।विविके अहंभाव हा पालटावा॥जनीं बोलण्यासारिखे आचरावें।क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥११५॥

बहू शापिता कष्टला अंबऋषी।तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी॥दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११६॥

धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे।कृपा भाकितां दीधली भेटी जेणे॥चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११७॥

गजेंदु महासंकटी वास पाहे।तयाकारणे श्रीहरी धांवताहे॥उडी घातली जाहला जीवदानी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११८॥

अजामेळ पापी तया अंत आला।कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला॥अनाथासि आधार हा चक्रपाणी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११९॥

विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं।धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी।जना रक्षणाकारणे नीच योनी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२० ||

महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला।म्हणोनी तयाकारणे सिंह जाला॥न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२१॥

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी।तया कारणें वामनू चक्रपाणी॥द्विजांकारणे भार्गवू चापपाणी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२२॥

अहल्येसतीलागी आरण्यपंथे।कुडावा पुढे देव बंदी तयांते॥बळे सोडितां घाव घालीं निशाणी।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥१२३॥

तये द्रौपदीकारणे लागवेगे।त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें॥कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२४॥

अनाथां दिनांकारणे जन्मताहे।कलंकी पुढे देव होणार आहे॥तया वर्णिता शीणली वेदवाणी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२५॥

जनांकारणे देव लीलावतारी।बहुतांपरी आदरें वेषधारी॥तया नेणती ते जन पापरूपी।दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी॥१२६॥

जगीं धन्य तो रामसूखें निवाला।कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला॥देहेभावना रामबोधे उडाली।मनोवासना रामरूपीं बुडाली॥१२७॥

मना वासना वासुदेवीं वसों दे।मना कामना कामसंगी नसो दे॥मना कल्पना वाउगी ते न कीजे।मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे॥१२८॥

गतीकारणे संगती सज्जनाची।मती पालटे सूमती दुर्जनाची॥रतीनायिकेचा पती नष्ट आहे।म्हणोनी मनाऽतीत होवोनि राहे॥१२९॥

मना अल्प संकल्प तोही नसावा।सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा॥जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा।रमाकांत एकान्तकाळी भजावा॥१३०॥

भजाया जनीं पाहतां राम एकू।करी बाण एकू मुखी शब्द एकू॥क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू।धरा जानकीनायकाचा विवेकू॥१३१॥

विचारूनि बोले विवंचूनि चाले।तयाचेनि संतप्त तेही निवाले॥बरें शोधल्यावीण बोलो नको हो।जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो॥१३२॥

हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी।जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे।तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥१३३॥

नसे गर्व आंगी सदा वीतरागी।क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी॥नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा।इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा॥१३४॥

धरीं रे मना संगती सज्जनाची।जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची॥बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे।महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे॥१३५॥

भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे।भयातीत तें संत आनंत पाहे॥जया पाहतां द्वैत कांही दिसेना।भयो मानसीं सर्वथाही असेना॥१३६॥

जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले।परी जीव अज्ञान तैसेचि ठेले॥देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना।जुने ठेवणें मीपणें आकळेना॥१३७॥

भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले।जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले॥देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना।जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३८॥

पुढें पाहता सर्वही कोंदलेसें।अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे॥अभावे कदा पुण्य गांठी पडेना।जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३९॥

जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं।गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना।जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१४०॥

                      || श्री कृष्णार्पणमस्तु ||

                            ( सज्जनगढ़ श्री रामदास स्वामीजी )




No comments:

Post a Comment