Sunday, June 02, 2019

THE LAW OF ATTRACTION (सकारात्मक ,नकारात्मक प्रभाव)

                                                                                                                                            संग्रहित 
THE LAW OF ATTRACTION (सकारात्मक ,नकारात्मक प्रभाव)

                   असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.
एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,
पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो? 
आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,
कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं,
का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं?
का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?
तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे,
आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन..
    तुम्हाला माहीतीय?...जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…
    जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.
     उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं.
माझं वजन वाढतयं, म्हटलं की वजन अजुन वाढतं, 
माझे केस गळतायत म्हटलं की अजुनच केस गळतात,
माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो,
कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून अडचणी निर्माण होतात,
वगैरे वगैरे...ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.  म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.
फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.
        मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली. 
विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.
      तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास, रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन, चेहर्‍यावर स्मितहास्य ठेवुन, मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा!..
1) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
2) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
3) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच अहे, आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
4) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे. 
5) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन, प्रचंड संपत्तीवान आहे.
6) मी एका प्रसन्न व्यक्तीमत्वाचा मालक असुन, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
7) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
8) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळुन जातात.
9) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे, आणि ती जिंकली आहे.
10) माझ्या आजुबाजूचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात, आणि मी ही त्यांच्यावर खूप खूप प्रेम करतो.
11) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहे, आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
12) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात, आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो. 
13) मी निरोगीआहे, 
14) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
15) मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे.
याला पॉझीटीव्ह अफैर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल
तुम्ही हे जर मनापासुन, फील करुन बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचलं, तर तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍या करुन दाखवेल. आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची दणदणीत सुरुवात असेल!..
ही आणि अशी प्रत्येक वाक्ये तुम्हाला अधिकाधिक शक्तीशाली आणि आनंदी बनवो,हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम्स, चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हटल्याबरोबर पळुन जातील! 
१) कितीही गंभीर समस्या असो, त्याकडे आश्चर्याने बघा – 
- आज दुकानात नोकर नाही आला, “अरे वा!, बघु आज, काय काय अडतयं त्याच्यावाचुन!”, 
- आज घरी कामवाली नाही आली, “असं का? मज्जा आहे मग आज!”
- पंचवीस तारीख आहे, पैसे संपत आलेत, “छान, मस्त काटकसर करु आता पाचसहा दिवस!”
- तो माझ्यावर निष्कारण चिडला, “अरे, तो असंपणं करतो का? असु दे! असु दे!” 
- तिने माझ्याशी उगीचचं भांडण केले, “हो का? किती मज्जा, आता रुसवा काढायची संधी मिळणार!” 
बघा, कसलीही, कितीही भयानक समस्या आणा, ह्या फॉर्मॅटमध्ये ठेवुन बघा, आश्चर्य व्यक्त केल्यास, समस्येची तीव्रता अचानक नाहीशी होते, 
“ओह! हे असं आहे का?, 
अरे! हे असं पण असतं का? 
ओके!” आहे त्याचा स्विकार केल्यास नव्याणव टक्के चिंता पळुन जातात. 
समजा, एखादा दात तीव्रपणे ठणकतोय, आता इथे कसा काय मार्ग काढणार? एक उपाय आहे. डोळे बंद करुन, त्या दुखणार्‍या दाताकडे संपुर्ण लक्ष द्या, त्या त्रासदायक संवेदना अनुभवा, त्या ठिकाणी शंभर टक्के मन एकाग्र करा. बघा वेदनांची तीव्रता कमी होईल, 
गंमत अशी आहे, की प्रत्यक्ष वेदना तितकं दुःख देत नाहीत, जितकं वेदनांमुळे मनात येणारे विचार त्रास देतात, वेदनांना विचारांपासून तोडलं की चिंता पळुन जाते! 
२) भुतकाळात घुटमळणे बंद करा – 
बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, 
- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मीही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.” 
- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.” 
- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!” 
- “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”
 “त्या कार्यक्रमाच्या दिवशी, ती मला अशी म्हणाली!”
अरे! व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना विसरुन गेलेलं बरं!
३) इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! – 
बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं,
- त्यांचं पॅकेज बारा लाखाचं आहे, मी कधी पोहचणार त्या ठिकाणी?
- त्यांच्याकडे इनोव्हा आहे, आपल्याकडे खटारा गाडी!
- ते मेट्रो सिटीत राहतात, किती ऐश करतात, नाहीतर आपण?
- ती किती सुंदर दिसते. स्लीमट्रीम! माझं वजन थोडं जास्तच आहे.
- हिला सासुचा ‘जाच’ नाही, किती ‘सुखी’ आहे ही!
- तीचा नवरा तिचा प्रत्येक शब्द झेलतो, माहीतेय!    वगैरे  वगैरे ......
ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवाद्वितीय आहे, 
गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! 
त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का?
प्रत्येक फुल अद्वितीय आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक फळाचा स्वतःचा एक गोडवा आहे, एक चव आहे, 
आंबा रसाळ, चवदार म्हणून चिक्कु, अननस खराब म्हणावेत का? 
संत्रा-मोसंबीने ईर्ष्या करावी का? 
केळीने माझे नशीबच फुटकं म्हणुन रडत बसावे का? 
सफरचंद-डाळींबाने आत्महत्या कराव्यात का?
कोणतं फळ चवदार आहे, 
कुणात औषधी गुणधर्म आहेत, 
कोणी पाणीदार आहेत, 
कोणी कोरडी. 
ज्याचं त्याचं एक वैशिष्ट्य आहे, जसं फळांचं, तसंच, माणसांचं!,
कोणी शार्प बिजनेसमन आहे, 
कोणी प्रचंड मेहनती आहे,
कोणी कलाकार आहे, 
कोणी बोलुन मनं जिंकण्यात तरबेज, कोणी प्रेमळ आहे, 
कोणी शिस्तप्रिय,
कोणी यशासाठी भुकेला आहे,
कोणी प्रेमासाठी आतुर!
आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं!
तुम्हाला माहीतेय, ह्या जगात साडेसहा अब्ज लोक राहतात, आणि प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्‍यापासून वेगळा आहे,
म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण!..
४) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा. – 
- आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, 
- आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे,
- आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, 
- आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, 
- आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे!
जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या. मोकळे आणि रिते व्हा. प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!
माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, 
अ) अपेक्षा
ब) अपुर्ण स्वप्ने,
क) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!
बहूदा आपण 'भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी?' या विचारात असतो. तो कसा सुखी आहे, ती कशी मस्त जगते, त्याच आयुष्य आरामशीर आहे, माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दुःखी होत तर नाही ना? 
बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. 
स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!
आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु.
जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो, 
आयुष्य कशासाठी? 
जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत! 
५) सेवा करण्यार्‍याला आत्मिक समाधान मिळते. - 
बघा! किती मजेशीर आहे हे,
- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,
- दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.
- झाड तप्त सुर्याच्या उन्हाचा मारा सहन करतो, आणि वाटसरुला सावली देतो,
- ज्यात कसलंही पौष्टीक तत्व नाही असे गवत, गाय खाते, आणि सकस, चविष्ट दुध देते.
- सुर्य जिथं भरपुर पाणी आहे, त्याची वाफ करतो, ढग बनवुन, जिथं पुरेसं पाणी नाही, अशा दुष्काळी प्रदेशात पाऊस पाडतो.
आणि म्हणुनच की काय, ह्या सर्वांना आपल्या संस्कृत्तीत पुजनीय मानलं गेलयं. 
काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे ?
इतरांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करण्यामध्ये एक वेगळे समाधान आहे, आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.
याच पाच सुत्रांचा मिळुन बनतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन! 
मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणाऱ्या, सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो, या प्रार्थनेसह शुभेच्छा आणि धन्यवाद!

Depends on relevant  reference books..............


No comments:

Post a Comment