Tuesday, August 20, 2019

SHIVA, SHANKAR Origin of the word (शिव, शंकर शब्द उत्पत्ती )

शिव, शंकर  शब्द उत्पत्ती 

बऱ्याच वेळेला श्री शिवशंकर हे संपूर्ण निळ्या रंगात दाखवले जातात. ते संपूर्ण निळे नसून आपण रामदास स्वामी लिखित "लवथवती विक्राळा" ही आरती नीट म्हटलीत किंवा ऐकलीत तर त्यात लिहीलेले तुमच्या लक्षात येईल कि, "कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ...." किंवा "कर्पुरगौरं करूणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारम ...."  ही त्यांची प्रार्थना पाहिलीत, तर तुम्हाला समजेल कि, *ते कापुरासारखे पांढरे शुभ्र आहेत.* त्यांचा फक्त कंठ निळा आहे. त्यांचा संपूर्ण परिवारच "पांढरा शुभ्र" आहे. त्यांचा वास आहे तो हिमालय पांढरा शुभ्र, त्यांच्या जटेतील गंगा पांढरी शुभ्र, त्यांची पत्नी "गौरी" नावातच गोरेपणा आहे, ती ही गोरीच आहे नावाप्रमाणे, त्यांच्या समोरील नंदी [या नंदीची आत्यंतिक अवस्था म्हणजे "आ"नंदी" किंवा "आनंद"] हा ही पांढरा शुभ्र. 

मंदिरात ज्या भागात मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली असते त्या भागाला  "गाभारा" म्हणजेच गर्भगृह असे म्हणतात. अर्थ स्पष्ट आहे.  "सृष्टि निर्मिती प्रक्रिया"  रस्त्यावरून जाताना शिव पिंड दिसत नाही. त्यासाठी आत गाभा-यात म्हणजे "आत मनात" (अंतर्मनात) उतरावे लागते. बाहेर असलेले कासव हेच सांगते की, मी जसे संकट आल्यावर माझे पाय आत ओढून घेतो, तसे देवाची भक्ती करायची तर मनाला आत ओढून घेऊन त्याचे बाहेरचे मोह, विकार, षडरिपू यांचे सारे दरवाजे बंद करा आणि आत या. मग तुम्हाला आपोआप "तो" दिसेल .... तसेच हे कासव सूचवते की, कांस्य रूपि रूद्र कारूण्य       दृष्टिने  समस्त भक्त गणाचा रक्षण हो तो, तसेच माझ्यासारखी तुमच्या मनाची बाहेरच्या विषया कडील धाव मंद करा, थांबवा. म्हणजे पूर्णतया कल्याण होईल.

"शं" "कर" म्हणजे कल्याण करणारा....

शिव = शव + इ. 'शव' म्हणजे शंकर आणि 'इ' म्हणजे शक्ती, म्हणजे पार्वती. जो पर्यंत शिव हे शक्तीयुक्त नाहीत तो पर्यंत ते शव म्हणजे प्रेतासमान निर्बल आहेत. म्हणून शिव हे अर्ध्या भागात पार्वती असलेले दाखवतात. (आरती ... अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ... ) त्याचाच दुसरा अर्थ असा की, प्रत्येक एका गोष्टीत थोडीशी दुसरी गोष्ट असते. हा शिव आणि त्यांची अर्धांगिनी "

"भाळि अर्ध चंद्र  माथी शुभ्र गंगा " 
शिवाच्या भाळावरील  चंद्र  म्हणजे ज्ञानेश्वरांनी वर्णिलेले चंद्रामृताचे तळे आहे. हे मेंदूत असते. योगातील जी सतरावी कला आहे त्यात हे तळे कलंडून त्यातून अमृत स्त्रवते. वैज्ञानिक भाषेत म्हणायचे झाले तर मेंदूतील "Thalamus - थलॅमस" ही ग्रंथी म्हणजे "सूर्य" आणि "Hypothalamus - हायपोथलॅमस" म्हणजे "चंद्र" होय. ज्या योग्याच्या मेंदूतील हा "चंद्र" पूर्ण कलेने प्रकाशत असतो तो सर्व विषयांचा जाणकार होतो, त्याची प्रज्ञा जागृत असते. त्याच्या शरीराची झालेली एक विदीर्ण अवस्था आणि देहाची अत्यंतिक आग ही या चंद्राने शमते. तसेच  शिवाचा तिसरा डोळा   म्हणजे दोन भुवयांच्या मधील भाग, ज्याला योगभाषेत  आज्ञाचक्र  म्हणतात, ते म्हणजेच आतल्या बाजूला असलेली  "Pineal - पिनीयल"  ग्रंथी होय. या ग्रंथीचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हात गेल्यावर ही ग्रंथी कार्यरत होते. म्हणजेच ती "Photo Sensitive" असते. याचाच अर्थ तिला "प्रकाश दिसतो". म्हणजे जो योगी प्रचंड साधना करून असा महासिद्ध होतो, परमहंस होतो त्याची ही प्रकाशाने जागृत होणारी ग्रंथी त्याला "महाजागृती" देते आणि सा-या विश्वातील [त्रिलोकातील] भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळातील सा-या गोष्टी त्या महायोग्यापुढे, त्याच्या "तिस-या डोळ्यापुढे अर्थात Pineal Gland - पिनीयल ग्रंथी पुढे दृगोच्चर होतात. *साधकाने स्वतः शंकर बनायचे आहे ..... साधना करून. 
वेगळ्या भाषेत शंकर म्हणजे कोण हे सांगायचे तर ते अणु केंद्रकातील "Neutron" आहेत. की जो अधिक किंवा वजा असा कोणताही विद्युतभार नसलेला असा शिवशंकरांसारखा एक  "विरागी, उदासीन" असा कण असतो. तो कोणत्याही रेण्वीय रचनेत प्रत्यक्ष भाग घेत नाही, पण त्याचे अस्तित्व आवश्यक सुद्धा असते आणि त्याची संख्या बदलली तर त्या अणूचे आणि त्या अणुमुळे बनलेल्या रेणूचे गुणधर्म बदलतात. यामध्ये प्रोटोन हे विष्णू आणि इलेक्ट्रोन हे ब्रह्मा असे म्हणता येईल. अणु आणि रेणूंची रचना ही कमळा प्रमाणेच दाखविली जाते. आता त्यात खोलात जायला नको. अजून त्यांचे एक रूप  विष्णू  हे [त्रिविक्रम अर्थात तीन पावलात जग व्यापणारे] उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि त्यामधील कोणताच ध्रुव गणला जात नसलेला एक भाग असे "तीन" पावलात जग व्यापणारे  "चुंबक" ,  ब्रह्मा  हे या चुंबकीय शक्तीला मायेची उपाधी लागल्याने निर्माण झालेली विद्युत, वीज किंवा वात  आणि  शंकर  हे या दोघांव्यतिरिक्त उरलेले "शेष" म्हणून  "गुरुत्वाकर्षण"  शक्ती ही होय. या "गुरुत्वाकर्षण" शक्तीच्या "शेष नागावर" चुंबकीय शक्ती किंवा विष्णू हे पहुडलेले असतात आणि त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव म्हणजे मायेच्या उपाधीने निर्माण झालेले विद्युत क्षेत्र हे होय.

एका शापामूळे शंकरांना पृथ्वीवर मूर्ती रुपात न पूजले जाता "पिंड" किंवा "लिंग" स्वरूपात राहावे लागते आहे. शिव हा शब्द "विश" म्हणजे प्रवेश करणे. आणि तो अक्षरश: त्याच्या कामाच्या स्वरूपावरूनच घेतला गेला आहे. 

इथे "विष्णू" हा शब्द "विष" या संस्कृत धातू वरून आला आहे. आणि या पोटफोड्या "ष" वाल्या "विष" या धातूचा अर्थ "व्यापून रहाणे" असा आहे. विष्णू हे हे जग व्यापून रहातात.  

"पिंड" हा शब्द, जे सूक्ष्मात आहे तेच स्थुलात आहे, जे पिंड म्हणजे एक "पेशीत" आहे तेच देहात आहे आणि अणुरेणूत आहे तेच ग्रहमाला, आकाशगंगांमधेही आहे हे दर्शवतो. 

लिंग आणि अंग असे देहाचे दोन भाग असतात. अंग हे मुख्य असते. शिवलिंग हे वरील लिंग आणि ज्यावर ते लिंग आहे ती शाळुंका अशा दोन भागांनी बनलेले असते. हे प्रकृति आणि पुरुषांच्या प्रतिक आहे. शंकरांच्या प्रदक्षिणेला "सोमसूत्री" प्रदक्षिणा असे म्हणतात. म्हणजे जिथे शाळुंका संपते तेथ पर्यंत जाऊन पुन्हा उलट फिरून उलट्या बाजूने शाळूंके पर्यंत जाऊन पुन्हा समोर येणे. इथे १ प्रदक्षिणा पूर्ण होते. प्रदक्षिणा म्हणजे- प्र- पुढे जाणे आणि दक्षिणा म्हणजे आपली उजवी बाजू .... म्हणजे आपल्या डाव्या बाजूने फिरत, सव्य गतीने, Clock Wise Direction ने पुढे जात आपल्या उजव्या बाजूला येणे म्हणजे प्रदक्षिणा ... पृथ्वी,चंद्र, ग्रह, तारे, अणु, रेणू हे सगळे गतिशील आहेत. आणि तेही फिरत आहेत मग आपणही जर योग्य पद्धतीने फिरलो तर एक विधायक, निर्मितीक्षम आणि जीवन बदलून टाकणारे कार्य करत असतो. म्हणून प्रदक्षिणा करायची.

शंकरांची पिंडी ही स्त्री पुरुष प्रतिक असल्याने आणि पूर्वीच्या ऋषींच्या अभ्यासानुसार त्यातून होणारी अत्यंतिक उर्जा निर्मिती ही रजस्वला म्हणजे पाळी चालू असलेल्या स्त्रियांच्या दृष्टीने घातक असल्याने त्यांनी शिव मंदिरात जाऊ नये असा दंडक होता. त्यात स्त्रियांना कमी लेखण्याचा प्रश्नच नव्हता. आता सर्वांनाच जसे माहित आहे की पिरॅमिड च्या वैशिष्ठ्यपूर्ण आकारामूळे त्यातून अत्यंत अचंबित करणारी उर्जा निर्माण होते. त्यात भाजी, फळे, दुध कित्येक दिवस खराब न होता राहते. ब्लेडला परत धार येते, आरोग्यासाठी उपयोग होतो ...वगैरे ... त्या प्रमाणेच  शिवपिंडीच्या वैशिष्ठ्यपूर्ण आकारा मूळेही प्रचंड उर्जा निर्मिती होते. 

आपण जर नीट पाहिले तर  सध्याच्या अणुभट्टीची रचना आणि कार्य हे देखील बरोबर शिवपिंडी प्रमाणेच चालते.  त्यातही फिजन पद्धतीने अणु उर्जा निर्माण केली जाते आणि भोवती फिरवलेले पाणी गरम होते ते वापरून उर्जा निर्माण केली जाते, हेही पाणी त्याज्यच असते. अशीच उर्जा शिवपिंडीतही तयार होत असते.    

सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखीप्रवण क्षेत्रात शंकरांची "बाराही ज्योतिर्लिंगे" आहेत. "ज्योती" या नावातच तेथील अग्नी दिसून येतो.  शिव पिंडीवरील भस्माच्या तीन पट्ट्यांमध्ये वेडेवाकडेपणा आला की पृथ्वीच्या पोटात काही हालचाल चालू आहे असे अनुमान लावीत असत. पूर्वी ऋषीनी असे अनेक वेगवेगळे प्रयोग केले होते. 

पिंडी मध्येही ५ तत्वांनुसार आकाशलिंग, वायूलिंग, अग्निलिंग, जललिंग आणि भूलिंग किंवा पृथ्वीलिंग असे ५ प्रकार आहेत. आपल्याला माहित असलेल्या रामायणातील गोष्टीप्रमाणे श्रीशंकरांनी रावणाला दिलेले लिंग हे "भूलिंग" होते. त्यामुळे ते त्याने पृथ्वीवर ठेवल्यावर पृथ्वीरूप होऊन गेले अर्थात चिकटले.        

सर्प - जागृत झालेली कुंडलिनी शक्ती .... हिचे वर्णन साडेतीन वेटोळी घालून बसलेला सर्प असेच आहे. 

त्रिशूल - हा शब्द ... त्रि म्हणजे तीन आणि शूल म्हणजे टोचणे, टोचणारे हत्यार अशा अर्थाने झाला आहे. यात तीन काय तर त्रिलोक - १] भू - पृथ्वी, भुव: पृथ्वीवरचे अंतराळ आणि स्व: म्हणजे स्वर्ग, २] त्रिदोष - अर्थात कफ, वात आणि पित्त ३] तीन मुख्य रिपू म्हणजे शत्रू - काम, क्रोध आणि लोभ या सर्वांवर विजय मिळविण्यासाठी ज्याने हे जे साधनेचे हत्यार धारण केले आहे ते म्हणजे त्रिशूल.   

डमरू - साधकाला आपल्या "नादाने" (अनाहत नाद) मंत्रमुग्ध करणारे हे डमरू वासने पासून सोडवते. हे वाजवताना चुकले तर त्यातील दो-याला टोकाशी असलेल्या गाठी वाजवणा-याला जोरात लागतात. त्यामुळे एकाग्रता आणि कुशलता अतिशय आवश्यक. शिवाय ते चामड्यापासून बनवलेले असते. साधकाने त्याचे शरीर असेच उत्तम "ताणायचे" असते की त्यातून योगध्वनी निघावा. 

गंगा - गं [ गम ] आणि गा अशा दोन शब्दांपासून हा शब्द बनला आहे. "गम" म्हणजे वेगाने फिरणे आणि "गा" म्हणजे धारण करणे, तिला रूप प्राप्त होणे होय. हे वेगाने फिरणारे जलतत्व शिव शंकरांच्या जटेत म्हणजे गुरुत्वाकर्षणामध्ये धरले जाऊन स्थिर होते. आणि नंतर मग "धरे" वर म्हणजे पृथ्वीवर सोडले जाते.   

वाघ्रचर्म - शिव शंकर जे वाघ्रचर्म परिधान करतात ते साधना करताना धारण केले तर साप, विंचू जवळ येत नाहीत. शरीरामध्ये उब रहाते. साधना करताना निर्माण होणारी वीज धरतीमध्ये निघून न जाता शरीरात फिरते. 

रुद्राक्ष - शंकरांचा डोळा म्हणून ओळखले जाणारे हे फळ, त्यावरील कमी अधिक रेघांमुळे एकमेकांपेक्षा वेगळे ओळखले जाते. साधकाला आवश्यक त्या हवेतील लहरी शोषून घेणे हे यांचे काम. याचे पाणी हृदय रोगांवर गुणकारी आहे. 

भस्मलेपन - भस्मामध्ये वनस्पती मधील अनेक गुणकारी द्रव्यांची "Oxides" असतात. जी पोटात घेण्याने आणि शरीराला वरून लावल्याने गुणकारी सिद्ध होतात. तसेच भस्म शरीराला वरून लावल्याने शरीराचे थंडीपासून आणि आसपासच्या किडे, विंचू यापासून संरक्षण होते. 

खडावा - पायातील लाकडी खडावा घालून फिरणे हे अतिशय अवघड असते. पाय, बोटे चालता येणार नाही इतके दुखतात. मनावर विजय मिळवण्यासाठी आणि तेथील अक्यूप्रेशरचे बिंदू दाबले जावेत म्हणू या खडावानचा उपयोग केला जातो. खडावा वापरल्याने पोट, निर्नाळ गृंथि, आणि मेंदूचे काम सुधारते. 

कमंडलू - स्वत:च्या शक्तीने भारीत केलेले पाणी यात ठेवले जात असे. याचा वैशिष्ट्यपूर्ण आकारही यातील पाण्याची शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असाच असतो. आपले ऋषी-मुनी हे फार मोठे संशोधक होते. फक्त त्यांची परिभाषा वेगळी होती. आपली आजची विज्ञानाची परिभाषा वेगळी आहे. त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथातील अर्थ आजच्या काळाशी सुसंगत असा, शोधून काढणे आवश्यक आहे. 
शिव शंकर हे तिन्ही काळ, त्रिलोक, जन्म, स्थिती आणि मृत्यू या तीनही अवस्थांना जिंकणारे आहेत म्हणून ते त्रिशूलधारी. अणु अवस्थेत ते "विरागी, संन्यासी म्हणजेच "Neutron"  म्हणजे जे Neutral राहतात ... त्यांचे "तांडव नृत्य" अणुगर्भात सततच चालू असते. 

No comments:

Post a Comment